आज संकष्ट चतुर्थी आहे, तीही अंगारकी. ’संकष्टी’ आणि ’विनायकी’ या गणेशाच्या उपासनेसाठी फार महत्वाच्या तिथी आहेत. विनायकी ही शुक्लपक्षाच्या चतुर्थीला मध्यानी पर्यंत असते. आणि चंद्रोदयाच्यावेळी कृष्णचतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. आजच्या संकष्टीची विशेषत: ही आहे की ती मंगळवारी आहे, म्हणून ती पुण्यप्रद मानली जाते.
या संकष्टीला अंगारकी असे का म्हणतात? हा अंगारक कोण?
अंगारक म्हणजे मंगळ, तो निखा-यासारखा लाल दिसतो. त्याच्या उत्पत्तीविषयीची कथा अशी की, भारद्वाज नावाचे ऋषी अवंती नगरात राहात होते. एकदा ते क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले असता, त्यांना सुंदर अप्सरा जलक्रीडा करीत असतांना दिसल्या. त्यांच्या मनात कामवासना जागृत झाली व त्या कामवासनेचे फलीत म्हणजे अंगारकाचा जन्म.
त्याचे पालनपोषण भुमातेने केले. सात वर्षानंतर अंगारकाने भुमातेला विचारले की, माझी त्वचा इतकी लाल कशी? तेव्हा भुमातेने त्याला त्याच्या जन्माची कथा सांगितली. अंगारक आपले पिता भारद्वाजांना भेटला, त्यांनी त्याचे उपनयन केले व उपासनेसाठी गणेशाचा मंत्र दिला. मंत्रांचे अनुष्ठान श्रद्घापूर्वक झाल्यामुळे प्रसन्न होऊन गणेश म्हणाले "तु सवौत्तम व्रत केले आहेस, या व्रताची किमया अपरपांर आहे. जो मनुष्य हे व्रत करेल त्याच्या समस्त मनोकामना पूर्ण होतील. त्याच्या कार्यात विघ्न येणार नाही. तु ’मंगल’ या नावाने विख्यात होशील, व तुझा वर्ण लाल आहे म्हणून तुला ’अंगारक’ या नावाने ओळखले जाईल व ही तिथी ’अंगारकी चतुर्थी’ या नावाने प्रख्यात होईल."
अंगारकाने हे व्रत मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी केले त्यामुळे त्याला स्वर्गात अढळ स्थान लाभले. ऋणमोचनासाठी, कर्ज फेडण्यासाठी अंगारकाचे अनुष्ठान केले जाते. अंगारक चतुर्थीला उपास केल्यामुळे बारा ते वीस संकष्टीचे उपवास केल्याचे पुण्य मिळते, अशी समजुत आहे. महाराष्ट्रात अंगारकीला ठिकठिकाणच्या गणेशमंदिरासमोर लांबच लांब रांगा लागतात. गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक या प्रांतातही गणेश उपासना दिवसेंदिवस वाढीस लागत आहे.